कोल्हापूर (संदीप घाटगे) : एखादा लावणीप्रधान मराठी चित्रपट असले की नाच्याच्या भूमिकेसाठी गणपत पाटील यांचेच नाव नजरेसमोर येते.. ढोलकीच्या थापेबरोबरच आत्ता गं बया! हे शब्द कानावर पडले की हा नाच्या नायिकेच्या सोबत पडदा व्यापून टाकायचा. मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गणपत पाटील या नटश्रेष्ठाचे आयुष्य मात्र अवहेलनाच सोसणारे ठरले.

गणपत पाटील यांचा जन्म १९२० साली कोल्हापूरमध्ये एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचा आधार हरवल्याने गणपत पाटलांना आई आणि सहा भावंडांची चिंता वाटू लागली आईला हातभार लागावा म्हणून मोलमजुरी करणे, भाजी विकणे अशी अनेक कष्टाची कामे ते करु लागले. पूर्वीच्याकाळी कोल्हापूरला मेळावे भरत असत त्यात रामायणातील सीतेची भूमिका त्यांनी साकारली होती. एकदा कॉलेजकुमारी या नाटकातून काम केल्याने त्यांना पुढे कॉलेजकुमारी म्हणूनच ओळख मिळाली. पुढे त्यांनी बाल ध्रुव या चित्रपटात काम केले. पण त्याकाळी या क्षेत्रात मुबलक पैसा मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी अन्य कामांकडे आपला मोर्चा वळवला. पुढे राजा गोसावी यांच्यासोबत ओळख झाली आणि त्यांनी मास्टर विनायक यांच्या शालिनी सिनेटोन मधून सुतारकाम, रंगभूषाकार अशी कामे केली. बलिदान आणि वंदेमातरम यासारख्या चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. त्यांचे काम पाहून चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी मिठभाकर चित्रपटात प्रथमच त्यांना खलनायकाची भूमिका देऊ केली.

जयप्रकाश दानवे यांचे ऐका हो ऐका हे नाटक त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारे ठरले. या नाटकात त्यांनी प्रथमच नाच्याची भूमिका साकारली. पुढे अशाच धाटणीच्या भूमिकांमुळे गणपत पाटील यांना प्रसिद्धी मिळू लागली. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र या भूमिका त्यांना त्रासदायक ठरल्या. एकदा राजाराम महाविद्यालयात त्यांनी मुलाखतीतून आपल्या आयुष्यातला वेदनामय कोपरा उलगडण्याचा प्रयत्न केला होता.

गणपत पाटील यांना चार अपत्ये दोन मुली आणि दोन मुलं. मुलींची लग्न जुळवत असताना अनेक अडचणी आल्या. या माणसाला मुलगी कशी काय होऊ शकते? आम्हाला समाजात तोंड दाखवायचे आहे. तुमच्या मुलीशी लग्न करून आमची पत, अब्रू सगळंच जाईल हे सांगताना मात्र ते खूप हळवे झाले होते.

वयाच्या ८६ व्या वर्षी २००६ साली नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटात त्यांनी काम केले होते. हा त्यांचा अभिनित केलेला अखेरचा चित्रपट ठरला होता. २३ मार्च २००८ साली प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेसृष्टीत तब्ब्ल ६२ चित्रपट आणि १७ नाटकांमधील त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने चित्रभूषण तर झी मराठीने जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. संपूर्ण आयुष्य संघर्षमय प्रवासात घालविणारा असा कलाकार मराठी सृष्टीला पुन्हा भेटणे शक्य नाही.