मुंबई (प्रतिनिधी) : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक केलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांची रवानगी तळोजा  कारागृहात आज (रविवार) सकाळी करण्यात आली. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनाही तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे.

या तिघांना  अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवले होते. दरम्यान, अलिबाग येथील कारागृह त्यांच्यासाठी सुरक्षित नसल्याने त्यांना तळोजा कारागृहात हलवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती. परंतु आपल्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार कारागृह महानिरीक्षकांच्या  परवानगीने त्यांना  तळोजा कारागृहात नेण्यात आले. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय उद्या (सोमवार) निर्णय होणार आहे. आता त्यांच्या जामिनावर उद्या निर्णय झाला नाहीतर  अर्णब यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे.