नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावले आहे. यावरून रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे पडसाद दिल्लीतही उमटू लागले आहेत.   

वास्तुविषारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. रायगड पोलिसांनी केलेल्या या अटकेवरून भाजपकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांनी या घटनेची तुलना आणीबाणीशी केली आहे.

तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत महाराष्ट्रात आणीबाणी २.० लागल्याचा दावा केला आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो आहेत. आणीबाणी २.० मध्ये आपले स्वागत आहे, असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.