कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना स्थिती सुधारत असताना कोल्हापुरात आजही रोजची कोरोना रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे तर म्युकर मायक्रोसीस रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोल्हापूरचा मृत्यूचा रेट चिंताजनक बाब आहे. याबाबत प्रशासनाला योग्य निर्देश देण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधलेल्या संवादावेळी बोलत होते.

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती करून पुन्हा कामास बळ दिले आहे. शिवसेनेला जिल्ह्यात पुन्हा गतवैभव प्राप्त करून सहा आमदार निवडून आणण्याचे वचन दिले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शहरातील समस्या, प्रलंबित प्रश्न, रखडलेल्या योजना, नियोजनात्मक विकास आराखडा याबाबत मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची मागणी केली. यासह प्रशासनाकडून शिवसेनेस होत असलेल्या दुजाभाव बाबत खेद व्यक्त करीत महाविकास आघाडीत कोल्हापूर जिल्ह्यात समसमान न्याय देणाच्या सूचना देणेबाबत विनंती केली. प्रशासनाच्या नियोजनाअभावी कोल्हापूर जिल्ह्यात बिघडलेली कोरोना आणि म्युकर मायक्रोसीस रुग्णाची स्थिती याबाबत माहिती देत प्रशासनास योग्य सूचना देवून नागरिकांना दिलासा देण्याबाबत मागणी केली. तसेच रोना काळात लाखो रुपयांची बिले वसुली करून रुग्णांची लुट करणाऱ्या जिल्ह्यातील काही डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी,  राज्य नियोजन मंडळाच्या कामकाजाबद्दल आणि जबाबदारी बद्दल लवकरच बैठक घेवू. कोल्हापूरची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असून त्यास लवकरच यश प्राप्त होवून जनजीवन सुरळीत झाल्याचे पहावयास मिळेल, अशी आशा व्यक्त केली. तर कोल्हापूरची कोरोना स्थिती सुधारण्यासाठी राज्यपातळी वरून योग्य ती यंत्रणा राबविण्याची ग्वाही दिली.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शिवसेना खासदार अनिल देसाई, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, डॉ.जयप्रकाश मुंदडा, श्रीमती राजश्री पाटील, डॉ.शशिकांत खेडकर, श्रीमती प्रीती बंड, डॉ.विजय आवटी, अनिल कदम, श्रीमती निर्मला गावित आदींनी आपली भूमिका मांडली.