कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२२-२३ अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग / फुलपिके लागवड, व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट व शेततळे या घटकांसाठी अनुदानाचा लाभ होण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट्य असून, यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा. अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती ( विमुक्त जमाती ), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसूंचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषी कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे. अर्जदाराची जमीन (०.०५  हेक्टर ते जास्तीत-जास्त २ हेक्टर पर्यंत ) असणे आवश्यक.

७/१२ व ८ अ, आधारकार्ड, बँक पासबुक व जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असून अर्ज गावातील ग्रामपंचायतीमध्ये करावे. मनरेगा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट, शेततळे व फळबाग/ फुलपिके ही कामे मंजूर आहेत.

अनुदान – व्हर्मी कंपोष्ट- रक्कम रुपये ११ हजार ९४४ प्रति युनिट, नाडेप कंपोष्ट –  रक्कम रुपये १० हजार ५३७ प्रति युनिट, शेततळे -आकारमानानुसार रक्कम रुपये ६० हजार ते रक्कम रुपये ३लाख पर्यंत व फळबाग/ फुलपिके – जास्तीत जास्त रक्कम रुपये २लाख प्रति हेक्टर याप्रमाणे. योजनेत अंतर्भूत फळपिके / वृक्ष – आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, नारळ, बोर, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, या सह इतर फुलपिके – गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा अनुदानातील अंतर्भूत बाबी -जमीन तयार करणे, खड्डे तयार करणे, कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे, खते देणे, आंतरमशागत, पीक संरक्षण व पाणी देणे इ.अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.