मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला आहे. अनेक जिल्ह्यातीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे कमी म्हणून की काय, राज्यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. राज्यात आता फक्त ७ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. यामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.

राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींना संपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, मी आज मुंबई आणि राज्यात  इतर ठिकाणाच्या ब्लड बँकांची माहिती घेतली. पुढील सहा ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या आहे, राज्यात कोरोना सुरू झाल्यापासून रक्तपुरवठा कमी झाला आहे. रक्तसाठा कमी होत असल्यामुळे आम्ही वेळोवेळी नागरिकांना आवाहन केले आहे. नियमित रक्तदात्यांनी रक्तदानाचे शिबिर आयोजित करावे. राजकीय नेत्यांनीही त्यांचे वाढदिवस साजरा होत असताना रक्तदान शिबिर आयोजित करावे, असं आवाहनही शिंगणे यांनी केले आहे.