मुंबई (प्रतिनिधी) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवलेला असतानाच केंद्राने ठाकरे सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपासही केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘एनआयए’कडे सोपवला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे दिला होता. मात्र, आता हे प्रकरणही ‘एनआयए’कडे देण्यात आलं असून, यासंदर्भातील आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काढले आहेत. ‘एएनआय’ने हे वृत्त दिलं आहे.

मागील काही दिवसांपासून अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्याचे प्रकरण चांगलंच गाजू लागलंय. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आला होता. मात्र, केंद्राने एनआयएकडे तपास सोपवला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अंबानी स्फोटकं प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळून आला होता.

हिरेन यांच्या मृत्यूवरून भाजपाने सरकारला धारेवर धरलं होतं. नंतर सरकारने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता. या प्रकरणात एटीएसकडून तपास सुरू झाला होता. तर दुसरीकडे एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आज (शनिवार)  मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही ‘एनआयए’कडे देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलाय. त्यामुळे अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन या दोन्ही प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे.