मुंबई (प्रतिनिधी) : न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी इडीच्या चौकशीला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचव्यांदा समन्स बजावल्यानंतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. ते चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आज (गुरुवार) त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. याआधी ५ व्यांदा समन्सं बजावल्यानंतर अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते.