मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपने   कोरोना काळात केलेल्या सरकारच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत टीका केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत उत्तर देताना निशाणा साधला. यावेळी ‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’ यावरुन ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले की, आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावं? काय करू नये, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला. ज्या लोकांनी मला संपर्क केला. जो मला प्रतिसाद मिळाला, त्यात महाराष्ट्रातील जनता मला मानायला लागले. ही माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे. पण, मी नेमकं काय करत होतो. आज जी परिस्थिती तयार झाली आहे, कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय? अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाउन करायचा की नाही. मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करू नका. कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन… पुन्हा येईन. काळजी घ्या. दुर्दैवानं थोडसं इकडेतिकडे झालं आणि व्हायरस पुन्हा परत आला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.