कोल्हापूर (प्रतिनिधी) : ३९ कोटीच्या मंजूर रस्त्यावरील अमृत योजनेतील पाईप लाईनची कामे ५ नोव्हेंबर पर्यत पुर्ण करा, पाईप लाईन टाकून झालेल्या भागामध्ये वीस दिवसात रिस्टोलेशन करा, अशा सुचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी दिल्या. आज (मंगळवार) स्थायी समिती सभापती यांनी स्थायी समिती सदस्य, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभाग आणि दास ऑफशोर यांची संयुक्त बैठक महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.

सचिन पाटील म्हणाले, शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कामाची सध्या काय परिस्थीती आहे याची माहिती दया. काम किती टक्के पुर्ण झाले आहे. नव्याने बांधण्यात येणा-या टाक्यांचे काम कोठे पर्यत आले. शिवाजी पार्क येथील टाकीचे बांधकामास स्थानिक लोक विरोध करत असतील तर पोलिस बंदोबस्तात पुर्ण करा. तसेच जे रस्ते मंजूर आहेत. त्या रस्त्यांवरील कामे तातडीने पाच नोव्हेंबर पर्यत संपवा, असे आदेश दिले.

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई म्हणाले, शिवाजीपार्क येथील टाकीचे काम पोलिस बंदोबस्तात सुरु करु असे सांगितले. नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील म्हणाले, ज्या प्रमाणे काळम्मावाडी येथे एक रुपये नाममात्र भाडे आकारुन जागा घेतलेली आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांच्याकडून नाममात्र भाडेने जागा ताब्यात घ्या.

यावेळी नगरसेवक जय पटकारे, राजाराम गायकवाड, उपजल अभियंता रामदास गायकवाड, राजेंद्र हुजरे, यु. झेड. भेटेकर, जयेश जाधव, शाखा अभियंता आर.के.पाटील, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, मिलिंद पाटील, एन.व्ही.नानिवडेकर आदी उपस्थित होते.