कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाअंतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात तिरंगा राखी विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट ला होणाऱ्या रक्षाबंधनासाठी या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटाच्या माध्यमातून या तिरंगा राख्या बनविल्या आहेत.

या बचत गटाच्या स्टॉलला आमदार जयश्री जाधव, प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर व सहा.संचाल नगररचनाकार रामचंद्र महाजन यांनी भेट दिली.हा स्टॉल महापालिकेच्या मुख्य चौकाबरोबरच चारही विभागीय कार्यालयाच्या परिसरात व पंत बाळेकुंद्री मार्केट येथील शहर उपजिविका केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. महिला बचत गटांना हे स्टॉल उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय नागरी उपजिविका विभागातील रोहित सोनुले, निवास कोळी, विजय तळेकर, स्वाती शाह, अंजनी सौदलगेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीसाठी घर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटाच्या माधमातून शहरात जनजागृतीचे काम सुरु आहे.

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात जवळपास १२०० हून जास्त महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माधमातून ४५ वस्ती स्तर संस्था स्थापन झाले आहेत. या दृष्टीने दि. ९ ऑगस्ट रोजी प्रत्येक नागरिकांनी घरासमोर सडा-रांगोळी काढावी, घराला तोरण बांधावे व दि. १३ ते १५ ऑगस्‍ट  या दिवशी घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन केले आहे.