मुंबई (प्रतीनिधी) : राज्यपालांना कोरोना झाला आहे. त्यामुळे त्यांचे काम मंदावले आहे. राज्यपालांना आधी बरे वाटू द्या. मग बघू कुणाकडे किती आमदार आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे एकनाथ शिंदेंसह आमचे सर्व लोक स्वगृही परत येतील. हा आमच्या घरातील विषय आहे. ते सर्व लोक आमच्या घरात येतील. एकनाथ शिंदे किंवा इतर लोक, सगळे परत येतील. त्यांचा आणि आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहेत, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एकनाथ शिंदेंसह पक्षातील आमदारांनी केलेल्या बंडाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे बंड शमवण्याचे प्रयत्न सुरू असून, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाली, याची माहिती स्वतः राऊतांनीच दिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर नाराज असल्याची आमदारांची भूमिका. मला याबद्दल माहिती नाही. आम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत. एकत्र आहोत. असे कुठल्या आमदाराने म्हटले आहे, असे मला वाटत नाही.’ असे राऊत म्हणाले.

बुधवारी सकाळीच माझे एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरू आहे. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेचेच काम केले आहे. त्यांच्याविषयी आणि एकमेकांविषयी आमच्या मनात कायम सद्भावना आहेत. काही गैरसमज असतात. त्यातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर होतील असे राऊत यांनी सांगितले.

ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असे भाजपला वाटते असेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. शिवसेनेने अनेकदा राखेतून गरुडझेप घेतली. हा गेल्या ५६ वर्षांतील इतिहास आहे, पण एकनाथ शिंदे आमचे जिवाभावाचे सहकारी आहेत. अनेक वर्षांपासून आम्ही काम करतोय. त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू असून, ती सकारात्मक आहे, असे राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे जुने सहकारी आहेत. मित्र आहेत. त्यामुळे पक्ष सोडणे त्यांच्यासाठी सोपे नाही आणि त्यांना सोडणे आमच्यासाठीही सोपे नाही. आमची सकाळी तासभर चर्चा झाली. कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. पुन्हा चर्चा होईल. सर्व आमदारांसोबतही आमची चर्चा सुरू होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.