जळगाव (प्रतिनिधी) : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला गळती लागली आहे. खडसेपाठोपाठ भाजप आमदार आणि नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

अस्मिता पाटील या भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या सदस्या देखील होत्या. आपण वैयक्तिक कारणासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाटील या भाजपमध्ये येण्याआधी राष्ट्रवादी पक्षात होत्या. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे पाटील या पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर पाटील या राष्ट्रवादी दाखल झाल्या नाहीतर शिवसेनेत सुद्धा प्रवेश करू शकता, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.