मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या १११ जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार होते, पण १११ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास स्थगिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ११४३ जागा भरण्यात आल्या होत्या. सर्व नियुक्त उमेदवारांना आज रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एमपीएससीतर्फे नियुक्ती पत्र दिले जाणार होते; पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यामधील १११ उमेदवारांना नियुक्तीपत्र देता येणार नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयात या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या विरोधात तातडीची याचिका दाखल करण्यात आली होती. संबंधित याचिका दाखल करणाऱ्या तीन EWS उमेदवारांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

ज्या १११ उममेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास स्थगिती देण्यात आली आहे. त्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यात येणार होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे आज (गुरुवारी) संध्याकाळी झालेल्या तातडीच्या सुनावणी दरम्यान याबाबत निकाल देण्यात आला.