मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रनौत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर आरोप करणं तर कधी देशातील घडामोडींवर खळबळजनक वक्तव्य करणं. यामुळे कंगना अनेकदा अडचणीत सापडली आहे. आता पुन्हा एकदा कंगनाला आलेल्या एका अडचणीमुळे कोर्टात धाव घ्यावी लागली. मात्र, कोर्टाने तिला दिलासा दिला नाही.  

पासपोर्ट प्राधिकरणानं कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरणास नकार दिला आहे. कंगनावर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्यानं तिच्या पासपोर्ट रिन्यूसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.  कंगनाला तिच्या धाकड या सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरीमध्ये जायचे होते. मात्र, कंगनाचा पासपोर्ट १५ सप्टेंबरपर्यंतच वैध असल्यानं तिला पासपोर्टचं तातडीनं रिन्यू करणे गरजेचे बनले आहे. कंगनाने याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कंगनालाच हायकोर्टानं चांगलं फैलावर घेत फटकारले आहे.