कोलकता (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी (वय ८५) यांचे रूग्णालयात  उपचार सुरू असताना आज (रविवारी) दुपारी १२.१५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला  धक्का बसला असून  सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

चटर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याने  ६ ऑक्टोबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. मात्र, त्यानंतर कोव्हिड एन्सेफॅलोपॅथी आणि कॉम्पिकेशन्समुळे त्यांची प्रकृती खालावू लागली. त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी १९५९ मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. फ्रान्समधील सर्वात मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. तसेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार, ७ वेळा फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.