कोल्हापूर (प्रतिनिधी) : मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारीविरुद्ध कारवाई केली जाईल. ग्राहकांनी अशा कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शासनाकडून मदतीच्या उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीबाबत काही ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. तर काही ग्राहकांना अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या व्याज दर, विविध शुल्क व दंड तसेच अन्य तक्रारी असतील तर त्यांनी १८००१०२१०८० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा मराठी भाषेत असल्याने ग्राहकांनी यावर तक्रारी दाखल कराव्यात, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. जर कंपन्यांनी ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा तक्रारीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला आहे.