पंढरपूर (प्रतिनिधी) : राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

साखर कारखान्याशी संबधित असलेल्या असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता या प्रश्नात लक्ष घातले आहे. यासाठी त्यांनी सांगली सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात ऊस तोड कामगारांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. आज मंगळवेढ्यातील नंदेश्वरमध्ये बैठक झाली.

आ. पडळकर म्हणाले की, ऊस तोड मजूराची मजूरी फक्त टनाला २४० रूपये आहे. यामध्ये त्यांचे कुटूंब चालणार कसे ? त्यांना मजूरी वाढवून दिली पाहिजे. मुकादमांना ३७ % वाढ करावी तर वाहतूकदाराना १५० % वाढ द्यावी, अशी मागणी आ. पडळकर यांनी केली आहे. सध्या कोव्हिडचे थैमान आहे. त्यासाठी साखर कारखान्याकडून कोव्गिड हॉस्पिटल उभारावे. ऊस तोड मजूरांना जर क्वारंटाईन केले तर त्यांना त्या दिवसांची मजूरी द्यावी. तसेच ऊस तोड कामगार महिलांसाठी शौचालयाची उभारणी सुध्दा करणे गरजाचे आहे.

जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या साखर कारखानदारी उद्योजकांनी ऊस तोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा आ. पडळकर यांनी दिला आहे. यामुळे आता साखर कारखानादारा समोरील अडचणी वाढणार आहेत.