आजरा (प्रतिनिधी) : मागील आठवड्यात आजऱ्याच्या आवंडी धनगरवाड्यावरील काही ग्रामस्थांच्या पाळीव गायी आकस्मिकपणे मृत्युमुखी पडल्या. याची माहिती मिळताच आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू व जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर यांनी प्रशासनासह या परिसराला भेट देऊन परिस्थिती समजून घेतली. तसेच नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. त्यांच्या या ग्वाहीने आपत्तीग्रस्त बांधवांना सहानुभूती लाभल्याची भावना व्यक्त होत आहे.

आवंडी धनगरवाडा क्र. ३ येथे ८ गायी अज्ञात रोगाने अचानक मृत्युमुखी पडल्या. येथील नागरिकांचे संपूर्ण अर्थकारण गायी, म्हशी आणि इतर दुभत्या जनावारांवर अवलंबून आहे. धनगर बांधवांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक आबिटकर यांनी या धनगरवाड्याला भेट दिली.

त्यांनी स्थानिक वाड्यावरील सरपंच, उपरपंच आणि इतरांसह बैठक घेतली. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनाबाबत तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी तहसीलदार विकास अहिर, पशु वैद्यकीय विभागाचे ए. टी. पाटील, रणजित सरदेसाई, विजय थोरवत, जितेंद्र भोसले, संतोष बाटले, बयाजी येडगे, बाबू येडगे, धोंडिबा कोकरे आदी उपस्थित होते.