गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील हेदवडे, गिरगांव, पाळेवाडी, कोळवण, भाटीवडे, नवरसवाडी, मोरेवाडी आदी गावांना महत्वपूर्ण असणाऱ्या भुदरगड तालुक्यातील फये पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी नियोजन आणि दुरूस्ती कामांचा आढावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आ. प्रकाश आबिटकर यांनी घेतला.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रकल्पाला लागलेल्या गळतीमुळे पाण्याचा होणारा अपव्यय आणि त्यामुळे होणारे शेतीचे नुकसान, केटीवेअरची दुरूस्तीची मागणी केली. यावेळी पाटबंधारे उपविभागीय अधिकारी संभाजी भोपळे यांनी आजतागायत प्रकल्पामधून एकही अवर्तन केलेले नसून ६५ % पाणीसाठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे पाणी सोडणार असल्याचे सांगितले.

आ. आबिटकर म्हणाले, प्रकल्पातून अवर्तन न करता देखील प्रकल्पाला लागलेल्या गळतीमुळे ३५% पाण्याचा अपव्यय झालेला आहे. याबाबत गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच प्रकल्पातील गाळ काढणे गरजेचे असून केटीवेअरची दुरूस्ती, व्हॉल्व दुरूस्ती करून गळती थांबविणे आदी कामे तात्काळ करण्याच्या सुचना केल्या. तसेच पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करून प्रकल्पाची गळती थांबविण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीला सूर्याजी देसाई, प्रविण नलवडे, पाटबंधारे शाखा अभियंता मनोज देसाई, एम.डी.पाटील, बाळासो गुरव, बाळासाहेब देसाई, अविनाश देसाई, शिवाजी देसाई, एकनाथ पांगम, प्रकाश पाटील, भगवान देसाई, शेतकरी उपस्थित होते.