मुंबई (प्रतिनिधी) : सभागृहात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. कोणत्या निधी कायद्यांतर्गंत पैसे मागितले जात आहेत, प्रभू श्रीरामाने यांना कंत्राट दिलं आहे का ? असा सवाल केला असता गोंधळ सुरु झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर संताप व्यक्त केला. हिंमत असेल तर राम मंदिरावर चर्चा लावा, असे थेट आव्हानच त्यांनी दिले.

नाना पटोले म्हणाले की, माझ्याकडे मनोहर कुलकर्णी नावाची एक व्यक्ती आली होती. यावेळी त्याने भगवान श्रीरामाच्या नावे मंदिरासाठी पैसे मागितले जात आहेत. आणि नाही दिले तर धमकावले जात आहे, असे सांगितले. अशा कोणत्या निधी कायद्यांतर्गंत हे पैसे गोळा करत आहेत. रामाने यांना टोलवसुलीचे कंत्राट दिले आहे का? याचे उत्तर पाहिजे. रामाच्या नावाने पैसा गोळा करणारे हे कोण?, अशी विचारणा केली.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिरावर चर्चा सुरु आहे का? तसं असेल तर स्वतंत्र चर्चा लावा. ज्यांना खंडणी गोळा करण्याची सवय आहे, त्यांना समर्पण कळणार नाही. असेल हिंमत तर चर्चा लावा, काही अडचण नाही, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.