मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. परंतु संसर्गाचा  धोका वाढू नये, यासाठी  परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आपल्यासोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले असून मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीदेखील यास दुजोरा दिला आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर रॅपिड अँटीजेन टेस्टिंग आजपासून (बुधवार) सुरू करण्यात आली आहे. दादर स्टेशनवर ही चाचणी सुरू करण्यात आली  आहे. दरम्यान, पालिकेने सगळ्या वॉर्ड मधील अतिरिक्त आयुक्तांना अशी चाचणी करण्याचे आदेश दिले होते. याठिकाणी करण्यात आलेली अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह असेल, तरच घरी सोडण्यात येईल. अन्यथा संबंधित व्यक्तीस क्वारंटाइन सेंटर किंवा रुग्णालायत दाखल करण्यात येणार आहे.