इंदापूर (प्रतिनिधी) : शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य करणे, भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलेच महागात पडू लागले आहे.  शेतकऱ्यांसह विरोधी नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीही दानवेंवर खरमरीत टीका केली आहे. भिगवण (ता. इंदापूर) येथे ते बोलत होते.

रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, असे रघुनाथदादा पाटील यांनी म्हटले आहे. पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी दानवे अशा प्रकारची विधाने करत आहेत. मात्र, अशा प्रकारचे वक्तव्य करणे पक्षाच्या फायद्याचे आहे की तोट्याचे याचा विचार ते कधीच करत नाहीत, असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे अजब वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. यावर दानवे यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. दानवे यांना घरत घुसून चोपले पाहिजे, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले होते. आता अशाच प्रकारची टीका रघुनाथ पाटील यांनी केली आहे.