नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटबंदीला चार वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘नोटबंदी’ हा पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता. तसेच राष्ट्रीय शोकांतिकेला चार वर्ष झाल्याच्या निमित्ताने तुम्हीही आवाज बुलंद करा, असे आवाहन देशातील जनतेलाही केले आहे.

गांधी म्हणाले की, आज भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा आहे. कोरोना संकट आले आहे. अशातच प्रश्न हा आहे की, बांग्लादेशाची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा पुढे कशी? एकवेळ अशी होती की, भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत उत्तम होती. यावर सरकारकडून कोरोनाचे कारण देण्यात येत आहे. पण कोरोना तर बांग्लादेशातही आहे. संपूर्ण जगभरात आहे. अशातच जर कारण कोरोनाचे असेल तर भारत सर्वात मागे कसा राहिला?’ भारताची अर्थव्यवस्था मागे राहण्यात कारण कोरोना नाही,  नोटबंदी आहे. जीएसटी आहे.

भारताची अर्थव्यवस्था नष्ट होण्याचे एकमेव कारण कोरोना नाहीतर, नोटबंदी आणि जीएसटी आहे. चार वर्षांपूर्वी मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर जाणीवपूर्वक आक्रमण केले. हे आक्रमण शेतकरी, मजूर, तरूण आणि छोट्या दुकानदारांवर होते. नोटबंदी सामान्य जनतेच्या पैशांनी मोदी मित्रांचे कर्ज माफ करण्यासाठी लागू करण्यात आली होती.