मुंबई (प्रतिनिधी) : आपण सर्व भूतकाळात जेव्हा डोकावतो तेव्हा समजते की काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते आणि आताही द्यायचे नाही. सुनावणीदरम्यान वकील उपस्थित नसणे, हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे. परंतु जनता सुजाण आहे, ती असल्या कटकारस्थानांना कधीच बळी पडणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

तात्पुरती स्थगिती उठवण्यात संदर्भातील सुनावणी अचानक ठरलेली नव्हती. ती पूर्वनियोजित होती. तरी देखील इतक्या महत्वाच्या विषयासंदर्भातील सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेला वकील गैरहजर असणे, याहून दुसरे बेजबाबदारपणाचे उदाहरण शोधून सापडणार नाही. तांत्रिक अडचणींमुळे वकील गैरहजर राहिला, असे बाळबोध स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले. त्यांच्या स्पष्टीकरणावरुन आणि एकंदरीत कारभारावरून त्यांना मराठा समाजाप्रती किती आत्मीयता आहे हे दिसून येते, असा टोलाही पाटील यांनी चव्हाण यांना लगावला आहे.