इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्राव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) विक्रमी ८०.७५ टक्के मतदान झाले. सत्ताधारी श्री गुरुदेवदत्त ग्रामविकास आघाडी व महाविकास आघाडी यांच्यात चुरशीने  लढत झाली. सहा प्रभागांसाठी ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

 

महाराष्ट्रातील पहिली आयएसओ मानांकनप्राप्त ग्रामपंचायत म्हणून यड्रावची ओळख आहे. सकाळपासूनच मतदार व कार्यकर्त्यांमधे उत्साह दिसून आला. सत्ताधारी श्री गुरुदेवदत्त आघाडीचे नेतृत्व विठ्ठलराव नाईक निंबाळकर (के. डी. सी. बँकेचे माजी चेअरमन) व राजवर्धन नाईक-निंबाळकर (जि. प. सदस्य) यांनी केले तर महाविकास आघाडीचे नेतृत्व सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर (माजी पंचायत समिती उपसभापती) यांनी केले. आज एकूण ६७८१ पैकी ५४७६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शहापूर पोलीस स्टेशनने कडक बंदोबस्त ठेवला होता. आता १८ तारखेला होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.