कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात काल (शुक्रवारी) दिवसभरात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकांकडून तब्बल ५०० जणांकडून ६१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न वापरनणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून केवळ एका दिवसात ६१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ४४७ जणांकडून ४४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर सामाजिक अंतर न राखण्याबददल २१ जणांकडून १० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्याबददल २८ जणाकडून ५ हजार ६०० रुपायांचा दंड आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल ४ जणांकडून ८०० रुपयांचा दंड  वसूल केला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणाव्यात, कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याचे सांगून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, शहरवासियांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रस्त्यांवर न थुंकणे, या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे राबवत आहे.

तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.