चंदगड (प्रतिनिधी)  :  पंढरपूर- सांगोला रस्त्यावरील कासेगांव येथील समर्थ हॉटेलजवळ बोलोरे आणि ट्रक यांची जोराची धडक झाली.  हा भीषण अपघात  आज (शुक्रवार) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला. यात ५ जण ठार झाले. तर ११ जण जखमी झाले आहेत. हे प्रवाशी चंदगड तालुक्यातील तिलारी बांधराई धनगरवाड्यावरील आहेत.  अपघाताचे वृत्त कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातामध्ये दोन पुरुष,  दोन महिला,  व लहान मुलगी  यांचा मृत्यू झाला आहे.  सखाराम धोंडीबा लांबोर,  सुनीता ज्ञानू लांबोर (वय ११), शाबुबाई लक्ष्मण लांबोर (वय ५०), नामुबाई काळू लांबोर, तुकाराम खंडू कदम अशी मृत्यू झालेल्या  प्रवाशांची नावे आहेत.

हे सर्व प्रवाशी बोलेरो गाडीने पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. यावेळी आज सकाळी कासेगांव येथील समर्थ हॉटेलजवळ बोलोरे आणि ट्रक यांची जोराची धडक झाली. ही धडक इतकी जोराची होती की, बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.     या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी भेट दिली.  जखमींना  सोलापूर येथील रूग्णालयात दाखल केले आहे.