कोल्हापूर (प्रतिनिधी) :  सांगली जिल्ह्यातील सूर्यवंशीवाडी, येळावी (ता. तासगाव) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकाची वीज चोरी महावितरणने पकडली आहे. या ग्राहकाने वीज मीटर बायपास करून थेट जोडणीद्वारे वीज वापर करीत ३९ हजार ७८८ वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे ५ लाख ५० हजार रुपयांची वीज चोरी केली. या प्रकरणी महावितरणने वीज वापरकर्ते अनिकेत जगन्नाथ सूर्यवंशी यांच्याविरूध्द वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सूर्यवंशीवाडी-येळावी (ता. तासगाव) येथील वीजग्राहक यशोदा उद्योग समूहाच्या वीज मीटरची तपासणी दि.२० ऑगस्ट रोजी करण्यात आली. वीज मीटरला जोडण्यापूर्वीच सर्व्हिस वायरला एक केबल जोडून त्यावरून वीजभार वापर करण्याची युक्ती ग्राहकाने अवलंबली होती. सर्व्हिस वायर पुढे वीज मीटरला जोडली होती. वीज वापराची नोंद होणार नाही, अशा पध्दतीने वीज मीटर बायपास केले होते. वीज चोरीच्या फेब्रुवारी २०२१ ते जुलै २०२२ या निर्धारित १८ महिने कालावधीत ३९ हजार ७८८ युनिटची वीज चोरी केली आहे. ग्राहकास वीज चोरीच्या युनिटचे आर्थिक मूल्यानुसार ५ लाख ५० हजार २६२ रुपये बिल देण्यात आले होते. नोटीस देऊनही ग्राहकाने वीज चोरीच्या दंडाचे बिल भरले नाही.

या वीज चोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा २००३, कलम १३५ अन्वये अनिकेत जगन्नाथ सूर्यवंशी यांच्याविरुध्द सांगली शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकार्यकारी अभियंता भारत व्हनमाने, कनिष्ठ अभियंता आदित्य पडघान, प्रधान तंत्रज्ञ सुनील कदम, वरिष्ठ तंत्रज्ञ विकास गणवीर यांनी ही कारवाई केली.