कराड (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागांव गावाजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर  एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (रविवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला. कारचा अक्षरश: चुराडा झाला होता.

कोल्हापूरहून कार (क्र. एमएच ०७ -एबी ५६१०)  भरधाव  वेगात पुण्याच्या दिशेने जात होती.  कार वहागांव गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवरील  वाहनावर आदळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तसेच एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर कारमधील पाच जणांपैकी एकाला बाहेर पडता आले नाही. पोलिसांनी अथक प्रयत्न करून चुराडा झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी रक्ताचे सडा पडला होता. याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.