कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३६३ आरोग्य उपकेंद्रांसाठी जवळपास १७ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

ना. यड्रावकर म्हणाले की, आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आरोग्य सेवेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करणे, उपकेंद्रांची डागडूजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटी आणि मजबूत करणे यासाठी हा निधी प्राप्त झाला असल्याचे सांगितले. तसेच या उपकेंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याबरोबरच आरोग्याबाबतच्या सर्व्हेक्षणाचे कामसुध्दा जबाबदारीने पार पाडले गेले आहे. एकुणच आरोग्य उपकेंद्रे यांची गरज कोरोना महामारीच्या काळात प्रभावीपणे जाणवली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणखीन मजबूत करणे गरजेचे आहे, असेही ना. यड्रावकर यांनी सांगितले.