जळगाव (प्रतिनिधी) : खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून  पपई घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. यावल-चोपडा रस्त्यावर हा अपघात रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास झाला.  तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे  मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मृत मजूर रावेर तालुक्यातील आभोडा, केन्हाळा व रावेर शहरातील आहेत.

घटनास्थळावरून  मिळालेल्या माहितीनुसार, यावल-चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. ट्रकमध्ये भरलेल्या पपयावर मजूर बसले होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे होते. हे खड्डे चुकविण्याच्या नादात ट्रक पलटी झाल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव आणि यावल ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्याला सुरूवात केली. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ केला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे.