मुंबई (प्रतिनिधी) : पोलीस भरती संदर्भात ज्या काही मागण्या होत्या त्या आता मान्य करण्यात आल्या आहेत. पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. आतापर्यंत ११ लाख ८० हजार पोलीस भरतीसाठी अर्ज आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७५ हजार पदांच्या भरतीसंदर्भांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. येथून पुढे जी मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या बैठकीत या ७५ हजार पदांच्या भरतीसाठी कोणत्या विभागाने काय कारवाई केली, त्याचा आढावा प्रत्येकालाच मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे, दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदे अधिकृत घोषणा करतील. १९९३ ते २००३ या कालावधीत ज्यांचे (ST) प्रमाणपत्र रद्द झाले म्ह्णून २०१९ साली ज्यांना अधिसंख्य पदावर घेण्यात आले होते. या सर्वांना अधिसंख्य पदावरच पुढे ठेवण्यात आले आहे. त्याच सोबत त्यांना निवृत्ती वेतनासह अन्य ज्या सवलती आहेत त्या सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

२०१९ पासून झालेली आदिवासींची पोलीस भरती प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी, असा आदेश देण्यात आला  आहे. त्यासोबत सोलापूर, तुळजापूर आणि उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला फास्टट्रॅकवर आणण्याकरिता राज्य सरकारने ४५२ कोटी रुपयांचा आर्थिक सहभाग देण्याचे मान्य केले आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या योजना होत्या त्याची दस्त नोंदणी केवळ एक हजार रुपयांमध्ये करण्यात यावी, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.