मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार दहावी आणि बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल.

गायकवाड म्हणाल्या की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २३ नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याचा‌ प्रस्ताव आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. त्याबाबत नियमावली, सूचनाही अद्याप जाहीर झालेला नाही. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना १२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद राहणार आहे.