नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गतवर्षी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला हे इम्रान खान सरकारचं कृत्य असल्याची निर्लज्ज कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी आज (गुरुवार) पाकिस्तानी संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष पीटीआय आणि इम्रान खान यांना दिलं आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. मात्र, आज पाकिस्तानच्या मंत्र्यांनेच पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. फवाद चौधरी यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना गेल्यावर्षी भारतात झालेला पुलवामा हल्ला हे पाकिस्तान सरकारचं मोठं यश आहे. भारताला आपण त्यांच्या घरात घुसून उत्तर दिलं असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे पाकिस्तानच होतं हे सत्य आता जगासमोर आलं आहे.