कोल्हापूर (प्रतिनिधी) : पती शहीद होऊन सुद्धा त्यांच्या नावे दिलेला प्लॉट मिळण्यासाठी १४ वर्षे संघर्ष करावा लागतो. या संघर्षाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीरोजी सकाळी १० वाजता आत्मदहन करणार असल्याचा इशारा वीर पत्नी वृषाली महादेव तोरस्कर यांनी  आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत दिला.

गडहिग्लज येथील वैशाली तोरस्कर यांचे पती महादेव तोरस्कर हे २००१ ला अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. याबद्दल शासनाने त्यांना बड्याचीवाडी( ता. गडहिग्लज) येथील विजयनगर येथे २००७ साली दोन गुंठ्याचा प्लॉट दिला. २००८ साली बांधकाम करण्यासाठी वैशाली तोरस्कर यांनी साहित्य आणले. बांधकामाला सुरुवात सुद्धा झाली निम्मे बांधकाम झाल्यानंतर त्यांना काही लोकांनी विरोध केला आणि बांधकाम थांबविले. या प्रकरणात तोरस्कर यांना न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल सुद्धा दिला.  मात्र, पुन्हा बांधकाम करण्यास स्थानिक दोन लोकांकडून विरोध होत आहेत.

माझ्याबरोबर दुसऱ्या एका वीर पत्नीला त्याच ठिकाणी प्लॉट मिळाला. त्याचे बांधकाम ही पूर्ण झाले.  मात्र, मला त्या ठिकाणी बांधकाम  करण्यास विरोध केला जात आहे. या जागेवर कोणतेही आरक्षण नसताना न्यायालयीन स्थगिती देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देत नाही.

तोरस्कर यांच्या बाजूने आजी माजी सैनिक संघटनेने सुद्धा अनेक वेळा आंदोलन करून निवेदन दिले आहे. मात्र, याला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे २६ जानेवारीला आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे तोरस्कर यांनी सांगितले. यावेळी आजी-माजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे,  बी.जी.पाटील, कुमार पाटील, तुकाराम जाधव आदी उपस्थित होते.