बीड (प्रतिनिधी) : टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा भाजप पक्षाचे काम आपल्या कुटुंबाने केले आहे. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष आता टिकाऊ झाला आहे, असे भाजपचे  खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. 

वडवणी तालुक्यातील काडी वडगाव येथे ‘सक्षम गूळ उद्योग’ या व्यवसायाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

खा. मुंडे म्हणाल्या की, भाजपचा राज्यात टाकाऊपासून टिकाऊपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय असा आहे. या प्रवासात सर्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनी मेहनत घेतली आहे. त्यामुळेच भाजप हा पक्ष महाराष्ट्रात टिकाऊ झाला आहे.  दरम्यान, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष फुललेला दिसत आहे. आपले भविष्य उज्ज्वल आहे. जसे पक्षाचे भविष्य उज्ज्वल आहे, तसेच तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.