चंद्रपूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. नातेसंबंध आणि महारोगी सेवा समितीमधील कलहाचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असेही सांगितले जात आहे.

आनंदवनातील महारोगी सेवा समितीचे काम आधी विकास आमटे ह्यांचा मुलगा कौस्तुभ बघत होता. नंतर शीतल आमटे यांचा नवरा गौतम जे कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत होते. नंतर त्यांनी नोकरी सोडली आणि दोघेही वास्तव्याला आनंदवनला आले. शीतल या वडिलांची खूप लाडकी, पण चुलत भाऊ अनिकेत आणि सख्खा भाऊ कौस्तुभ ह्यांच्यावर मात्र तिचे बरेच गंभीर आरोप राहिले.

कौस्तुभला हळू हळू काम देणे बंद केले. मग सीईओ ची पोस्ट निर्माण झाली. शीतल सीईओ झाली. कौस्तुभ आणि इतर काही बाहेरच्या मंडळींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत कौस्तुभला पूर्णच दूर सारले. त्यानंतर परिवार पूर्ण विभाजित झाला. शीतल, विकास, गौतम एकीकडे आणि कौस्तुभ, आई भारती आणि इतर सर्व परिवार हा दुसऱ्या बाजूला. यादरम्यान शीतल आमटे मानसिक डिप्रेशनमध्ये गेल्या. समोरच्या मंडळींची बाजू काही पत्रकारांनी मोठमोठया बातम्या करून लावल्या की डिप्रेशनमध्ये असणारी शीतल अगदी हिस्टरिक झाल्यासारखी रडायची आणि ह्याने नक्कीच मानसिकस्तिथी अजूनच खालावत असणार आणि त्यातच कौस्तुभला पुन्हा समितीत घेतले.

अत्यंत गंभीर (गलिच्छ) आरोप करत परिवारातील काही सदस्यांवर शीतलने एक व्हिडियो त्या रागात टाकला. या व्हिडीओने नेहमी तिला साथ देणारे वडील, विकास आमटे ह्यांनीही साथ सोडली. सर्वजण हेमलकसाला गेले. विकास आमटेंनी फोन बंद केला. घाबरलेल्या शीतलने व्हिडीओ डिलीट केला. तरीही फोन मात्र सुरू झाला नाही. त्यानंतर शीतल आमटे मानसिकरित्या अत्यंत खचल्या. माझे वकील ही बंद केले असे त्या म्हणत. त्यामुळे मीडियाला आता काय उत्तर देऊ हे सांगायला सुद्धा कोणी नाही. ढसाढसा रडणाऱ्या शीतलला सर्वात सोपा सल्ला दिला की काही बोलायचे नाही. पण सतत सोशल मीडिया आणि इतर व्यासपीठांवर व्यक्त होणाऱ्या शीतल आमटेंना हे जमणारे नव्हते. त्यात नवरा आणि छोटासा मुलगा सोडून गेले. त्या अधिकच तणावात राहिल्या, त्यामुळे हे सर्व घडले असल्याचे बोलले जात आहे.