आजरा (प्रतिनिधी) : मराठा महासंघाने राज्यात सुमारे ३०० पैकी १७० तालुक्यांमध्ये नवीन संघटन तयार केले आहेत. पुढील काळात उर्वरित तालुक्यांबरोबर गोवा, कर्नाटक राज्यात मराठा संघटन बांधण्यात येणार आहेत. मराठा समाजाने एका छताखाली काम करण्याची गरज आहे, असे आवाहन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. ते आज (बुधवार) आजरा येथे आयोजित केलेल्या चंदगड, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज तालुक्यातील मराठा महासंघाच्या मेळाव्यात बोलत होते.

मारुती मोरे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, मराठा संघटन हे नुसते तालुकावार संघटन न करता गावो, गावी, गल्लोगल्ली संघटन होणे गरजेचे आहे. या वेळी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाले बद्दल वसंतराव मुळीक यांचा सत्कार करण्यात आला. मुळीक म्हणाले की, आरक्षणाबरोबर सारथी संस्थेचे कामकाज व्यवस्थित चालणे गरजेचे आहे तसेच कै अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्यवस्थीत चालवले पाहिजे तरच समाज आपल्या पायावर उभा राहील. आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे आणि ते आम्ही मिळवणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. अनेकजणांकडून ओबीसी व मराठा यांच्यात वाद लावण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो कोणीही करू नये असेही त्यांनी सांगितले

यावेळी वसंतराव मुळीक यांनी मारुती मोरे यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड केली. त्याचबरोबर चिककोंडी, बेळगाव, निपाणी, गोवा राज्य या भागाचे संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. यावेळी आजरा तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी स्वागत तर डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले.