कोल्हापूर (प्रतिनिधी) : जीवन मुक्ती सेवा संस्थेचा (व्हाईट आर्मी) २१ वा वर्धापनदिन आणि वीर जवान अभिजित सुर्यवंशी यांच्या २० व्या स्मृति दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२५) बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर मशाल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ऐतिहासिक बिंदू चौकात सायंकाळी ६.३० वाजता शहीद जवानांना मानवंदना देवून डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्धांच्या हस्ते हजारो श्रद्धा-दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. या प्रसंगी महाड दुर्घटनेतील बचाव कार्यात सहभागी झालेल्या व्हाईट आर्मीच्या जवानांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे रोकडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला व्हाईट आर्मीचे विनायक भाट, सुमित साबळे, प्रशांत शिनगे आदी उपस्थित होते.