कोल्हापूर (प्रतिनिधी) :  क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील वासुदेव कॉलनीमध्ये बुधवारी रात्री उशिरा मित्राची भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. आकाश आनंदराव वांजोळे (वय २८, रा वासुदेव कॉलनी, नाना पाटील नगर) असे त्याचे नाव आहे. तर या हल्ल्यात दत्तात्रय तम्मा फोडे (वय ३०, रा. वासुदेव नगर, नाना पाटील नगर) जखमी झाला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी आज (गुरुवारी) भरत दिलीप कचरे, सुरेश दिलीप कचरे व मारुती दिलीप कचरे (सर्व रा. वासुदेवनगर, फुलेवाडी रिंग रोड) या तिघा सख्ख्या भावांना अटक करण्यात आली.

क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील वासुदेवनगरात दत्तात्रय फोडे राहतात. बुधवारी रात्री उशिरा गटारीमध्ये जेवणाचे खरकटे टाकण्यावरून झालेल्या वादातून त्यांचा याच परिसरात राहणाऱ्या भरत कचरे याच्याशी वाद झाला. त्या वेळी भरत, त्याचे भाऊ सुरेश व मारुती यांनी फोडे याच्यावर कोयत्याने वार केले. फोडे यांचा मित्र आकाश वाजोळे भांडण सोडवण्यासाठी आला असता सुरेश कचरे याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात आकाशचा  मृत्यू झाला.

याप्रकरणी फोडे यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आज तिघांना अटक केली.