मुंबई (प्रतिनिधी) : पैसे भरले नाहीत तर वीजपुरवठा खंडित करू, हे ऊर्जामंत्र्यांचे फर्मान तुघलकी आहे. वीज ग्राहक अडचणीत असल्यामुळे राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहे. सरकारने ग्रामपंचायत निवडणुकां झाल्यानंतर लगेच  तुघलकी निर्णय घेतला आहे. याचा भाजप निषेध करत आहे, अशा शब्दांत भाजपचे महाराष्ट्र मीडिया प्रमुख आणि ‘महावितरण’चे माजी संचालक विश्वास पाठक यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा चुकीची बिले दिली. त्यात सूट देण्याच्या नुसत्या घोषणा करण्यात आल्या. आता ग्राहकांची वीज बिले माफ करणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. पण, ऊर्जामंत्री स्वत: चार्टर्ड विमानाने फिरत आहेत. बिल्डर्सना ५० टक्के प्रिमियममध्ये सूट दिली आहे. सव्वा वर्षात ऊर्जा खात्यातील  चार-पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत असा निर्णय घेणे चुकीचा असल्याचे पाठक यांनी म्हटले आहे.