मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोना लस मोफत देण्याची मागणी होऊ लागली आहे. यावर केंद्र सरकार राज्याला निधी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारने नकारघंटा वाजवली आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. सरकारची ही तर रोजचीच बोंबाबोंब आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

लसी संदर्भात सर्व प्रोटोकॉल केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरवले आहेत. त्यानुसार पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लस मोफत देण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. किमान गरीब आणि मध्यम वर्गाला लस मोफत देण्यासाठी राज्याने केंद्र सरकारची मदत घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले असताना आपण सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले. वेगवेगळ्या उपाययोजना  केल्याने कोरोनावर आपण नियंत्रण मिळवू शकलो, असे फडणवीसांनी सांगितले.