मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे संभाजीनगरबद्दल धोरण पाहिले, तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेब सेना आहे, अशी खोचक  टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले की, शिवसेनेची बोलायची भाषा वेगळी आहे.  आणि कृती करताना औरंगजेबप्रमाणे वागते. आताही औरंगाबाद नामांतराबाबत शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेला औरंगजेब सेना म्हटल्याचे वावगे ठरणार नाही. औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता. हाच प्रस्ताव तत्कालीन संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी मंत्रिमंडळात मांडला असता युती सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर काँग्रेस नगरसेवक मुश्ताक अहमद हायकोर्टात गेले असता त्यांचे म्हणणे फेटाळून लावले. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात नामांतरणाची सूचना मागे घेत असल्याचे सांगितले, असे केशव उपाध्ये यांनी सांगितले.