कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघ मागील २५ ते ३० वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला संघ आहे. ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ चांगल्या पध्दतीने चालू आहे. परंतु गोकुळची सर्व सत्ता ताब्यात हवी आहे, म्हणून केवळ राजकारणासाठी त्यांना गोकुळची निवडणूक लढवायची आहे, असा आरोप भाजप नेते धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाडिक पुढे म्हणाले की, राजाराम कारखान्याच्या मागील निवडणुकीत मतदान करणाऱ्या लोकांचेही सभासदत्व रद्द केले आहे. ही कार्यवाही सूडबुद्धीने केली आहे. डी. वाय. पाटील कारखानाचे ६५०० सभासद होते. पण एका रात्री ते कमी करून २२०० वर आणले आहेत. हे सत्तेचा वापर करून केले आहे, असा आरोपही महाडिक यांनी यावेळी केला.