श्रीनगर (प्रतिनिधी) : पुलवामामध्ये घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेला आज (रविवार) २ वर्ष झाली आहेत. पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी आज देशवासीय शहिदांना श्रध्दांजली वाहत असताना पुन्हा असाच दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट रचला गेला होता. परंतु भारतीय लष्कराच्या जवानांनी सतर्कतेने हा कट उधळून लावला. 

दहशतवाद्यांनी जम्मू बसस्टॅण्डजवळ मोठया प्रमाणावर दडवून ठेवलेली ७ किलो स्फोटके जवानांनी हस्तगत केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी पुन्हा मोठा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. परंतु जवानांनी त्यांचे कुटील मनसुबे उधळून लावले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. कोणताही भारतीय हा दिवस विसरू शकत नाही. आम्ही त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो, जे या हल्ल्यात शहीद झाले होते. आम्हाला आपल्या जवानांचा अभिमान आहे, त्यांच्या शौर्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील,  असे ते म्हणाले.