मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर भारतात तुफान पाऊस आणि गारा पडत असताना आता महाराष्ट्रात देखील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत मुंबईसह कोकणात रिमझिम पाऊस तर चार जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात गारठा वाढल्याचेही जाणवत आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचं संकट आले आहे. जानेवारी महिन्यात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी-वाऱ्यासह पुढील तीन दिवस पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ६ ते ९ जानेवारीदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस होईल तर बीड, जालना, अकोला, सोलापुरात गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या आंदाजानुसार १८ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, वाशीम, वर्धा, अकोला, नागपूर, बुलडाणा, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतात दिल्ली, हरियाणासह अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. तर गारपीटचं सावट आहे. पुढचे तीन दिवस हवामान विभागाने इशारा दिला आहे. तर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून बळीराजा चिंतेत आहे.