कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे २५ सप्टेंबरला पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होईल. शेतकरी विरोधी विधेयके संमत केल्याच्या निषेधार्थ राज्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.

पत्रकाकत म्हटले आहे की, मोदी सरकारने राज्यसभेत ३ शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली. या विधेयकाचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. देशातील शेतकऱ्यांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या विधेयकांचा तीव्र विरोध केला आहे. नव्या विधेयकामुळे सरकार हमीभावातून शेतकऱ्यांना बाजूला सारत आहेत. या शेतकरी धोरणाविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांमध्ये तीव्र अंसतोष पसरलेला आहे.

या विधेयकाच्या विरोधात २५ सप्टेंबर रोजी सर्व पक्षीय भारत बंद पुकारला आहे. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असून राज्यातील सर्व शेतकर्यांनी या शेतकरी विरोधी विधेयकाचा विरोध करण्यासाठी २५ तारखेच्या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.