नागपूर (प्रतिनिधी)  : नैसर्गिक संकटांमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे.

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी यासंबंधी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, आम्ही राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. याबाबतचा निर्णय अंतिम झाल्यास सिंचनासाठी अखंडित वीज देण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात येतील. कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील विजेची मागणी वाढली असली, तरी पुरेसा वीजपुरवठा येत आहे. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यांच्याशी सध्या चर्चा सुरू आहे. हा तिढा लवकरच सुटेल. वीज कर्मचारी संपावर जाणार नाहीत. कोणाचीही दिवाळी अंधारात जाणार नाही.