मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. पण आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (बुधवार) दिली.

विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे प्रा. गायकवाड यांनी आज माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा करताना सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अकरावी महाविद्यालय प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच अकरावी महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.